Sunday, August 18, 2019

It takes a village...

"पण मला हो म्हणून ही तू का आला नाहीस, ते आधी सांग"

"मी येतो असे म्हटलेच नव्हते. त्या तीन दिवसांच्या ट्रीपला मी येत नाही म्हणून सुद्धा तू परत परत आग्रह करतच राहिलास म्हणून मी फोनवर तुला म्हटले की बरं तू मला संगीतलेस आणि मी ऐकलं!"

"हे आता तू शब्दाचा कीस पाडत आहेस. इतक्या वर्षांनी माझ्या शब्दाला तू किती महत्त्व देतोस ते कळले. आणि तू आला नाहीस म्हणून तुझी धाकटी मुलगी ही घरी थांबली."

"पण तुला हे माहिती आहे का की तिने बॅग ही भरली होती. शेवटच्या दहा मिनिटे आधी तिचा तिने निर्णय बदलला. आम्ही सगळ्यांनी तिला समजावले. मी तर तिच्या एकटीशी ही बोललो की आई आणि ताई ही जात आहेत, तुझ्या आवडीचे दोन्ही काका आहेत, इतरही बरीच मुले आहेत, समुद्र आहे, तुला नक्कीच मजा येईल, तर तू जावेस असे मला वाटते. मी तिला असे ही विचारले की मी गेलो असतो तर? त्यालाही तिने चक्क नकार दिला होता आणि वर म्हणाली तू जा ना मी रहाते एकटी!"

"पण तू आला असतास तर तिला काही पर्याय राहिलाच नसता. तशी ही ती एकटी एकटी रहाते. गप्पा मारत नाही. अशा ट्रिपमधून तिला ही चार लोकं भेटले असते, नवी मैत्री झाली असती. पण तुला तुझ्या मतांच्या पलिकडे मुलीचा विचार करावा असे ही वाटले नाही."

"आता तू सगळे खापर माझ्यावर फोडतो आहेस. मी तुला सांगितले की मी तिला समजावायचा प्रयत्न केला म्हणून"

माझ्या दोन मित्रांचे हे संभाषण पुढे जाईना तेंव्हा अचानक माझी साक्ष काढण्यात आली!

"तू गप्प का? तुला वाटत नव्हते का ह्याने यावे असे? मुलीसाठी तरी ह्याने स्वतःचा हेकेखोरपणा जरा बाजूला ठेवायला हवा होता की नाही?"

खरे तर तो घरी राहिला ह्याचे मला जराही नवल वाटले नव्हते आणि त्याची मुलगी ही अगदीच लहान नाही चांगली सातवीत आहे. थोडी लाजते, बुजते पण ओळख असेल तर बोलते. माझा मित्र जरी सगळ्याच गॅदरिंगला येत नसला तरी ती दरवेळी तिच्या आई आणि ताईबरोबर येते  सगळीकडे. ह्याचवेळी तिने असे का केले आणि त्यात माझा मित्र न येण्यामुळेच असे झाले असेल का हे सांगता येणे कठीण होते. पण माझ्या दुसऱ्या मित्राचा राग खरोखरच त्या मुलीला विचारात घेऊन होता की आमचा मित्र त्याची मर्जी असल्याशिवाय नुसते आम्ही म्हटले म्हणून कुठे ही येत नाही ह्यावर होता हे ही मला कळत नव्हते. ह्या संभ्रमात मी कोणाचीच बाजू घेऊ इच्छित नसल्याने नुसताच सुस्कारा सोडला.

तरी माझे मत गृहीत धरून मित्राने परत तोफ डागली!
"हे समजून घे की तुझी मुलगी डीट्टो तुझ्यासारखी होत आहे. पुढे जाऊन तुलाच त्रास होईल. एक लक्षात घे की पालकांच्या चुकांमुळे मोठी होऊन मुले ही चुकीचे निर्णय घेतात. हल्लीच मी एक रिपोर्ट वाचला त्यात ड्रग घेण्यामागे मुलांबाबतचे पालकांचे चुकीचे निर्णय हे ही एक कारण दिले आहे. तू जे सारखं ऐकवतोस ना की जबरदस्ती न करता दरवेळेस मुलांना पाहिजे ते तुम्ही करू देता, बघ ती मोठी होऊन समाजात वावरताना भांबावेल आणि इतर प्रॉब्लेम झाले की तुलाच ब्लेम करेल तेंव्हा कळेल!"

आता मात्र मी मधे पडलो "अरे तू एकदम टोकाला जात आहेस. त्याची मुलगी चांगले गाते, भरपूर वाचते, गणितात ही चांगले करत आहे. हे सर्व आई बाबा तिला वेळ देतात म्हणूनच शक्य आहे ना! आणि ती ह्याच वेळी आली नाही. आपण एवढी तिची काळजी करत असू तर त्यासाठी काही ऍक्शन घेतली नाही तर ह्याला नुसतेच वॉर्न करून सोडले तर आपण आपली जबाबदारी झटकून टाकली असे होईल. आपण ह्याला शिक्षा देण्यासाठी ह्याच्या घरीच ट्रिप नंतरचे गेट टुगेदर करू. परत मुलं ही एकत्र येतील आणि एकत्रितपणे फोटो ही बघू मस्त! म्हणजे तिलाही कळेल तिने काय मिस केले ते!  शेवटी म्हटले आहेच की it takes a village to raise a child!"

Monday, July 22, 2019

माझी परिक्षा...

माझ्या एका तरूण मित्राच्या ऑफिस ग्रुपबरोबर अभयारण्य बघायला जायचा बेत ठरला. माझी तयारी करून भेटीच्या ठिकाणी ठरल्यावेळी पोचलो. एकेक करून माझ्या मित्राच्या मित्र-मैत्रिणी आणि त्यांची लहान लहान मुले येऊ लागली. बघता बघता ३५-४० जणांचा गट जमला. निघे तोपर्यंत जुजबी ओळखी झाल्या. त्यातल्या काही जणांची निसर्गभ्रमंतीची ओढ पाहून मला आनंद वाटला. दळ मोठे असले तरी वेळेवर हलले! अभयारण्यात शिरेपर्यंत  साडे अकरा वाजले.

आता दरीतून खळखळत वाहणारी नदी दिसू लागली. अडीच तीन हजार फूट खोल दरीच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याला दुसर्‍या बाजूच्या तेवढ्याच वर उंच चढलेल्या डोंगराने पोटात घेतल्याप्रमाणे वाटत होते. रस्याला लागून एका भल्या थोरल्या खडकाजवळची गर्दी पाहून आम्ही ही थांबलो. त्या खडकाचा गडगडत जाण्याचा प्रवास एकमेकांपासून दोन हात दूर असणार्‍या असमान उंचीच्या दोन छोट्या बुरुजांनी रोखला होता. रस्त्यापासून खडकाचा तळ दहा बारा फूट वर तर माथा चांगला तीस पस्तीस फूट तरी उंच वाटत होता. खडकाची रस्त्याकडची बाजू भल्या थोरल्या घसरगुंडीसारखी दिसत होती. खडकाला पादाक्रांत करणार्‍या वीरांमुळे डाव्या बुरुजाच्या बाजूने खडकाच्या माथ्यावर जाणारी एक पायावाट तयार झाली होती. आमच्या ग्रुपमध्येही बरेच मावळे होते. माथ्यावरून वेगवेगळ्या पोझेस देणार्‍यांचे फोटो काढण्यापेक्षा त्यांना खालून सांभाळायला सांगणार्‍या त्यांच्या घरच्यांच्या पोझेसचे आणि चेहर्‍याचे फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही! वर जाण्यापेक्षा त्यां दोन बुरुजांच्या मधून जाणार्‍या पायवाटेवर उभे राहून मी त्या खडकाला खालूनच जोखले. पायवाटेवर पुढे जाऊन मागच्या बाजून दगडाचे फोटो काढताना दुसर्‍या बुरुजाच्या आणि खडकाच्या खबदाडीत कधीतरी वापरले गेलेले घरटे ही दिसले. वर्दळ सगळी खडकाच्या समोर, डाव्या बुरुजाजवळ आणि त्याच्या माथ्यावर, घरट्याची जागा निवडणारा पक्षी हुशार!

थोड्या वेळाने जेवणासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो. वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली माझी थाळी गप्पा ऐकता ऐकताअ संपली. सगळे आवरून, काहींचे फोटो सेशन संपवून, तासाभराने पुढचा प्रवास सुरू झाला.

वळणावळणाचा रस्ता डोंगर माथ्याकडे चालला होता. आजूबाजूला महाकाय डोंगर रांगा होत्या. एका खिंडिनंतरच्या वळणानंतर डोंगरात एक मोठी घळ होती आणि तिथे तुषारांवर इंद्रधनुष्य दाखवत एक धबधबा बोलावत होता. आम्ही तिथे न थांबतो तरच नवल होते. परत एकदा फोटो सेशन झाले. तीस चाळीस फुटांवरून पडणारे पाणी दगडांवर आपटत, फेसाळत पुढे जात होते. धबधब्याच्या खाली जाणे तर शक्यच नव्हते. शक्य तेवढ्या जवळ जाऊन थंडगार पाणी अनुभवून मी बाहेर आलो आणि किनार्‍याला लागून असलेली वेगवेगळी जंगली फुले पहात होतो. प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर जांभळ्या रंगाच्या जंगली फुलांच्या छोट्या गालीच्याने माझी वाट अडवली. मध्येच एखादी एखादी निळी गुलछडी ही उभी होती. मग मला आठवले की वाटेत काही काही डोंगर उतार मधे मधे जांभळ्या रंगाचे दिसत होते ती हीच फुले असणार!

सगळे होईपर्यंत पाच वाजले. काहींचे डोके दुखू लागले होते तर काहींना अंधाराच्या आत परतायचे होते तर काहींनी लहान मुलांची कारणं देत मुक्कामापाशी परत जायची टूम काढली. दुसर्‍या दिवशी परत उठून आणखी काही ठिकाणे पहायची होती. त्यामुळे परतीच्या मागणीकर्‍यांच जय झाला.

पहिल्या दिवशी तरी अभयारण्यातून फार काही न पहाता परतावे लागत असल्याने मी थोडा अस्वस्थ होतो. एकंदरीत मोठा ग्रुप, वेगवेगळा वयोगट, वेगवेगळी आवड ह्यामुळे असेल आणि उद्याचा दिवस ही आहेच असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेत मागे पडणारा निसर्ग पाहू लागलो. दोन डोंगरच्या उतरणीपैकी एकाच्या मागून एक भला थोरला सुळका वर आला होता आणि त्या सुळक्यामागे आणखी एक महाकाय डोंगर होता. संधी प्रकाशामुळे पूर्वेला असणार्‍या डोंगररांगा आकाशाचाच भाग झाल्यासारख्या भासत होत्या. खोल समुद्रात जशी आकाशाची व्याप्ती जाणवते तसेच होत होते. पहावे तिकडे महाकाय डोंगर रांगा! असेच चालत जाऊन ह्या डोंगर रांगामध्ये हरवून जावे असे वाटते होते.

मुकाम स्थळी पोचून आवरून होईपर्यंत हॉटेल मधून मागवलेले जेवण ही आले. जेवणानंतर आईसक्रीम ही आणले गेले. गप्पा हास्य विनोदाच्या आवाजात एकाने उभे राहून सगळ्यांना शांत केले आणि सर्वांना प्रश्न केला "आजचा दिवस कोणा कोणाला आवडला?" जवळ जवळ सगळ्यांनीच जल्लोष करत हात उंचावले. सगळ्यांना शांत करून टाळ्या वाजवत तो म्हणाला "मला जरा ही आवडला नाही! आवडण्याचे तर सोडाच मला तर मी इथे आलो त्याचेच वाईट वाटत आहे. का माहीत आहे?" आता काय बाहेर येणार ह्या चिंतेने सगळ्यांच्या चेहार्‍यावर प्रश्न चिन्ह दिसू लागले. त्यानेच मग उत्तर द्यायला सुरवात केली "अभयारण्याला भले संरक्षण संवर्धनाचा संदेश द्यायचा असेल पण आपल्यासारख्यांनी तो घेतला तर ना! आपण आलो बारा तेरा गाड्यांमधून, दोन्ही वेळेला जेवलो थर्माकोल-प्लास्टिक कोटेड थाळ्या आणि प्लास्टिक चमचे वापरून, दिवस्भर पाणी प्यायलो प्लास्टिकच्या छोट्या बाटल्यांमधून, इथे ही परतल्यावर आपल्याला साधा ओला-सुका कचरा ही वेगळा करता येत नाही?" आता सागळ्यांना त्याचा रोख कळला आणि वातावरण आणखी गंभीर झाले. तो पुढे म्हणाला "अभायरण्यात येऊन प्राणी - पक्षी पहाणे तर सोडाच आपण तर दिसणार्‍या झाडा फुलांची दखल ही घेतली नाही. उद्याचाही दिवस फक्त फोटो आणि नावापुरती अभयारण्याची सहल ह्यासाठी ज्यांना घालवायचा असेल त्यांच्या बरोबर मला यायचे नाही. मी उद्या वेगळे फिरयाला जायचे ठरवले आहे आणि माझ्या बरोबर येण्यास इच्छुक असणार्‍यांना आजच्या दिवसात काय खास निसर्ग निरिक्षण केले त्याची माहिती द्यायला लागेल आणि मी जास्तीत जास्त तीनच जणांना माझ्याबरोबर घेऊन जाईन!"

ह्या परिक्षेत पास होऊन माझी जागा राखण्यासाठी माझ्याकडे बर्‍यापैकी माहीती आहे असे वाटून मला एकदम हायसे वाटले!

Wednesday, March 27, 2019

निसर्गप्रेमींना तोड नाही...

गावात आलेल्या अनोळखी गाडीची बातमी अख्या गावाला लगेचच कळावी असे जेमतेम पाचशे घरांचे घाट माथ्यावरचे दुष्काळी गाव. पुढे पठार, कोरड्या दर्‍या आणि ओसाड डोंगरांच्या रांगा. पण ह्या वर्षी पावसाने अचूक वेळ साधत जमिनीत दडून बसलेल्या जंगली झाडांच्या बियांना भोज्जा करून कोंब फुटवले. तो बाण डोंगर उतारावर असा लागला होता की पुढील दोन महिन्यात अख्खा डोंगर उतार इंद्रधनुषी होऊन गेला.  गावाने ही कधी न पाहिलेली रंग बरसात दर्‍यांमधून दिसू लागली. जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात बातमी ही झळकून गेली. एक दोन दिवस त्याची चर्चा करून गाव परत आपल्या कामात गुंतला.

आज सकाळपासून प्रत्येक गाडीवान मोबाईलवरचा फोटो दाखवत रस्त्याकडेच्या घरातल्या माणसांना दिशा विचारत विचारत दरीकडे गेले. गावकर्‍यांना ही जरा अप्रूप वाटलं. दोन पाच उत्साही मुले गाड्यांना रस्ता दाखवायला सायकल दौडवत गेले. आज अख्या दिवसात पंचवीस तीस गाड्या गावात येऊन गेल्या. पुढे एक दोन दिवस गाड्यांची संख्या वाढत गेली.

शनिवारी सकाळी गाव जागा झाला तो गाड्यांच्या आवाजानेच! दुपार पर्यंत तर गावातल्या प्रत्येक रस्यावर गाड्या उभ्या केलेल्या दिसू लागल्या. तरी ही येणार्‍यांची संख्या कमी होत नव्हती. मारूतीच्या शेपटासारखी गाड्यांची लांबच लांब रांग डोंगरावरून दिसत होती. गावकर्‍यांना घराबाहेर पडणं अवघड झाले. त्यांना तर त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाल्यासारखे झाले. एवढी गर्दी हाताळायला गावातील पोलिस ही तयारीचे नव्हते. गावात हॉटेल तर सोडाच चहा-पाण्याची सोय नव्हती.

तिथे पठारावर आणि दरीवर तर क्रिकेट मॅचला गर्दी जमावी तेवढी गर्दी! जिथे जाणं ही अवघड अशा ठिकाणी निसर्गप्रेमी चक्क बसकण मारून घसरत घसरत, असंख्य फुले चिरडत आपल्या फोटोत दुसरा कोणी येऊ नये म्हणून आणखी चांगल्या जागा शोधत होते. गाड्यांच्या टायरखाली पठारावरील किती फुले चिरडली गेली ह्याची तर गणतीच नव्हती.  छान एकांतात फुललेला निसर्ग गर्दी बघून आकसून गेला.

सोमवारी पेपरात आलेला गर्दीचा आकडा बघून गावकरी चक्रावले. लवकरच गावाची एक सभा बोलावली गेली. कारण पुढील काही अठवड्यात काय होईल ह्याची गावकर्‍यांना भितीच वाटू लागली. सभेसाठी पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांना ही बोलावले गेले. गेल्या अठवड्याभरात स्थानिक पोलिसांचा, गावकर्‍यांचा एकंदरीत कसा गोंधळ उडाला हे मांडण्यात आले. सभे नंतर सर्वांनी एक फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेतला. सभेत ठरवल्याप्रमाणे पोलिस आणि वन विभागाच्या संकेत स्थळावरून, सोशल मिडीयावरून जिल्ह्याच्या वर्तमानपत्रातून पर्यटकांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. वेशीवर, पठारावर ही तसे फलक लावण्यात आले. अठवडाभर असलेली ’तुरळक’ गर्दी हाताळत गावचा निसर्ग वाचवण्यासाठी शनिवार रविवारच्या मोठ्या लढाईला गाव तयार झाला.

शनिवार दुपारच्या आतच गर्दी हाताळण्यासाठी केलेली मोर्चे बांधणी पूर्णपणे कोलमडली. मागच्या वेळपेक्षा तिपटीने पर्यटक आले. उभे केलेले काही फलक आता फुलांबरोबर गप्पा मारत होते! वहानांची संख्या इतकी वाढली की हायवेवरून गावाकडे येणारा रस्ता बंद करावा लागला. निसर्गविधीसाठी केलेली सोय ही कोलमडली आणि अचानक एका दूरच्या पठारावर वावटळच उठली. रस्ता बंद करता काय...मग आम्ही हेलिकॉप्टरनेच येतो! गर्दीपासून दूर असलेल्या एक जोडपे खरोखरच हेलिकॉप्टरने उतरले. त्यांच्यावर काय कारवाई करता येईल ह्याचा विचार अधिकारी अजून करत आहेत!

एकंदरीतच सातार्‍याजवळचे कास असू द्या नाही तर कॅलिफोर्नियातील लेक एल्सिनोर - वॉकर कॅनियन..किंवा आणखी कुठले गाव...निसर्गप्रेमींना तोड नाही!

लेक एल्सिनोर - वॉकर कॅनियन बातमीसाठी