Friday, November 22, 2013

नक्की बदल होत आहे...

काल कोन्हवली गावात, चिपळूणपासून २.५ तासावर, शैक्षणिक केंद्र संमेलनात म्हणजे शिक्षकांच्या शाळेत गेलो होतो ! एका केंद्रात साधारण १२-१५ शाळा असतात. सर्व केंद्रांनी महिन्यातून एकदा असे संमेलन भरवून त्याचा अहवाल सादर करणे अपेक्षीत आहे. सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन चर्चा करणे, शैक्षणिक समस्या सोडवणे, विचारांची देव-घेव असे स्वरूप असते.
देव्हारे केंद्रातर्फे आयोजित केलेल्या कालच्या सत्रात ४० शिक्षक होते. प्रार्थनेनंतर (होय, शिक्षकांचीही प्रार्थना!), पर्यावरण संतुलन ह्या विषयासाठी सह्याद्रीला बोलावले होते. त्यानंतर पुस्तक परिचय, नविन उपक्रम असे काही आणखीही कार्यक्रम होते. प्रत्येक कार्यक्रमानंतर थोडे खेळ! कोन्हवलीच्या शिक्षकांनी भरवलेल्या छोट्या प्रदर्शनात एका शिक्षकांनी एक कॅलेंडर कापून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे स्वतःच्या टीपणीसकट छान दाखवले होते. तसेच छोटे छोटे घनाकृती खोके वापरून गणित शिकवण्याच्या सोप्या पद्धतीही दाखवल्या होत्या. काही शिक्षकांनी रांगोळ्याही काढल्या होत्या. इंग्रजी शिकवण्याच्याही काही सोप्या पध्दती काही शिक्षकांनी दाखवल्या होत्या.
सुंदर परिसर, सर्वांचा सहभाग, अगदी घरगुती वातावरणामुळे कार्यक्रम छानच झाला. कोन्हवलीच्या शिक्षकांनी जेवायला तर चक्क मसाले भात, पुरी, कुर्मा, जिलबीची सोय स्वत:च केली होती. सगळ्यात मुख्य म्हणजे, विद्दार्थ्यांकडे ताटे मांडणे, वाढणे आणि चक्क ताटे घासण्याचीही जबाबदारी दिली होती.
नक्की बदल हो आहे...